Friday, 31 July 2020

पं. पन्नालाल घोष स्मृती अभिवादन

पं. पन्नालाल घोष स्मृती अभिवादन.

भारतीय संगीतातील विविध वाद्यांमधील सर्वात प्राचीन वाद्य म्हणजे, वीणा, मृदंग आणि बासरी.

त्यामधील भगवान श्री. कृष्णाने लोकप्रिय केलेले वाद्य म्हणजे  बासरी, वेणु, बंसी अशा नावाने ओळखले जाणारे वाद्य,  त्याच्या मधुर ध्वनीमुळे अधिक लोकप्रिय आहे. भारतीय संगीतात या वाद्याचा समावेश लोकगीत, चित्रपट गीत, ते शास्त्रीय संगीतात आढळतो. विविध गीतप्रकारांमध्ये  बासरी या वाद्याचे वेगळे स्थान आहे. 

कोणतेही वाद्य जनसामान्यांमध्ये लोकप्रिय करण्यात अनेक कलाकारांचा, त्यांच्या वादनशैलीचा महत्त्वाचा वाटा असतो. उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतात स्वतंत्र वादनात बासरी या वाद्याला मानाचे स्थान मिळवुन देण्याचे श्रेय पंडित पन्नालाल घोष यांना दिले जाते.

अनावधानाने हातात आलेले बासरी हे वाद्य त्यांनी अतिशय प्रेमाने आत्मसात केले आणि गायकी अंगाने बासरीच्या स्वतंत्र वादनास सुरुवात केली. ख्याल गायनातील सर्व आलंकरणाचा हुबेहुब उपयोग  पं. घोष यांनी त्यांच्या वादनशैलीमध्ये आणला, आणि शास्त्रीय संगीतामध्ये बासरी या वाद्याची वेगळी ओळख करून दिली.

स्वतः शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेऊन त्यातील बारकाव्यांचा उपयोग, गायकी अंग शैलीतून बासरी वादनात केला. मानवी गळ्याच्या अगदी जवळ जाणारे बासरी हे वाद्य गायकी अंगाने वाजवुन, त्यातील माधुर्य अधिक वाढवले.

कलाकाराचा मुळ स्वभाव त्याच्या कला सादरीकरणात परावर्तीत होत असतो असे म्हणतात. पं. पन्नालाल घोष यांच्या संवेदनशील स्वभावामुळे त्यांचे बासरी वादन मनाला जाऊन भिडणारे होते. ते स्वतः गायक, बासरी वादक आणि संगीतकार होते. त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतात स्वतंत्र वादन केले नाही तर त्याकाळातील विविध चित्रपट गीता मध्ये बासरी वादन केले आहे. त्यांनी अनेक बंगाली गीतांमध्ये ही बासरी वादनाने संगत केली आहे. संगीताची मनापासुन असलेली आस, त्यांची चिकाटी आणि स्वभावातली संवेदनशीलता या मुळे त्यांच्या बासरी वादनात वेगळ्या प्रकारची आर्तता होती. 

त्यांच्या स्वतंत्र वादनातील मारवा, यमन, देस अशा रागांमधून त्यांच्या वादनातील आर्ततेचा प्रत्यय येतो. 

आपल्या अल्पायुष्यात त्यांनी संगीतासाठी खुप मोठे काम केले. आज अभिजात संगीतामध्ये स्वतंत्र बासरी वादन आनंदाने ऐकताना, आशा थोर व्यक्तींची आठवण ठेवणे क्रम पात्र ठरते.

आज त्यांची जयंती (काहीं ठिकाणीं 24 जुलै असा उल्लेख) , त्या निमित्ताने त्यांच्या थोरवीची आठवण आपण काढावी आणि त्यांनी केलेल्या महान कार्यासाठी मनात कृतज्ञता व्यक्त करावी.


- अश्विनी जोशी



Saturday, 25 July 2020

नागपंचमी लहानपणीची आणि आताची...

 *" नागपंचमी लहानपणीची आणि आताची.."*

माणसाच्या मनात, प्रत्येक, सणाच्या, विशिष्ट घटनांच्या, व्यक्तींच्या, वास्तूच्या  खुप आठवणी दडलेल्या असतात. त्यात्या प्रसंगी त्या आठवणी जशाच्या तशा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. माझ्या बाबतीत असे अनेक वेळा होतं आणि मग मन एकदम लहान होऊन जातं.

आज नागपंचमी, असच सकाळी स्वयंपाक करताना मन लहानपणीच्या आठवणी मध्ये गेलं आणि सगळं जसच्या तसं आठवलं. नागपंचमी म्हटली की हातावरची लालचुटुक रंगलेली मेहेंदी आणि तिचा हाताला येणारा उत्कट सुवास, हातातल्या नवीन बांगड्या, छान जरीचा फ्रॉक नाहीतर परकर पोलका, आमच्या घरी मागच्या दाराला नानांनी, माझ्या आजोबांनी बांधुन दिलेला झोका आणि आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणाचे दिंड. परंपरे प्रमाणे केलेला सगळा स्वयंपाक, चिरणे, तवा कढई वर्ज्य असल्यामुळे कोणत्याही शेंगांची भाजी, दह्यात कालवलेली दाण्याची चटणी, किंवा मेतकुट, आणि आळू किवा पालकांच्या वाफवलेल्या वड्या.. बास एवढंच असायचं पण त्या जेवणाला वेगळीच चव असायची.

लहानपणापासूनच मला मेहेंदी खुप आवडते. वेगवेगळ्या प्रकारच्या मेहेंदीचा सोहळा मला मनापासुन आवडीचा. मेहंदीच्या हिरव्या पानांना वाटुन मेहेंदी लावण्यापासून ते आज आयता कोन घेऊन मेहेंदी काढण्या पर्यंत सगळे सोहळे मनाच्या आनंदासाठी. अगदी लहानपणी आठवतं, आई रात्री मेहेंदी लावायची त्यात हातावर चार गोळे आणि त्याच्या भोवती काडी ने बारीक ठिपके. नाहीतर सरळ एका हाताला चोपडा, म्हणजे पूर्ण हातभर नुसती मेहेंदी आणि ही मेहेंदी रात्री अंथरुणाला लागु नये म्हणून आई तिच्या साडीच्या कपड्याने हात हलका गुंडाळुन ठेवायच्या. सकाळी उठल्यावर उत्सुकता एकच, कोणाची मेहेंदी जास्त रंगली. मेहंदी धुण्याआधी आई हाताला खोबऱ्याच तेल लावून द्यायची आणि मग ती धुतल्यावर दिवसभर त्या रंगलेल्या हाताकडे बघत आणि त्याचा मनभरून अनेकदा वास घेत असे. जसं जशी मोठी झाले तशी बारीक कोनाच्या मेहेंदीचे वेड लागलं, मग त्यासाठीचे सगळे सोपस्कार शिकले आणि दरवेळी अजुनच छान मेहेंदी काढायला लागले.

त्यानंतर आवडीचा म्हणजे मागच्या दरात बांधलेला झोका, तसा छोटा होता पण फळीवराचा तो झोका मला खुप आवडायचा, नागपंचमीच्या २/३ दिवस आधीपासून झोका बांधण्यासाठी आम्ही बहिणी हट्ट करायचो आणि बांधल्यावर आळीपाळीने १०/१५ झोके असे मोजुन खेळायचो. हा झोका दाराला बांधलेला होता, खेळताना तो आर्धा घरात आणि अर्धा बाहेर यायचा त्याची मला खुप मजा वाटायची. त्यावरची फळी टोचू नये म्हणुन आई त्यावर मऊ चादर घालुन द्यायची. काही वर्षांनी तो झोका बंद झाला पण कितीतरी वर्ष घराच्या माळ्यावर झोक्याची फळी होती, माळा आवरताना नेहमी ती फळी झोक्याची आठवण करुन द्यायची.

नागपंचमीच्या दिवशी हमखास आमच्या घरी नागोबाला घेऊन गारुडी यायचा.. पुंगी वाजवत नागोबाला डोलवायचा त्याला बघायला खुप मजा वाटायची. त्यादिवशी आई देवासमोर पाटावर गव्हाच्या पीठानी नागाची रांगोळी काढून पुजा करायची, त्याला ज्वारीच्या लाह्या आणि दुध साखरेचा नैवेद्य दाखवायची.. मला सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे.. संध्याकाळी आम्हा मुलींबरोबर आईनी वाचलेली नागपंचमीची कहाणी.. मन लाऊन ती ऐकायची, त्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहायचं. परत रात्री झोपताना हाताच्या रंगलेल्या मेहेंदीकडे डोळेभरून पाहून झोपत असे.

आजची नागपंचमी स्वतःपेक्षा, मुलींसाठी जास्त असते. त्यांना मेहेंदी लाऊन द्यायची, त्यांच्यासाठी पुरणाचे दींड करायचे, नवीन बांगड्या आणि आज ट्रॅडिशनल घाला, असा आग्रह करत साजरी करायची. लहानपणी झोका घरात बांधायचे. पण आता फ्लॅट मध्ये ते शक्य नाही. नागपंचमी आता फक्त मुलींसाठी साजरी करतेय असं वाटतं आणि त्यात आनंदही आहे..

तरीही लहानपणीची रंगलेल्या हातातल्या मेहेंदी ची आणि झोक्याची नागपंचमी अजुनही मनात तशीच दरवळतेय...!!!


- अश्विनी जोशी.

Wednesday, 27 August 2014

हाती हात घेऊन.......

हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो. .
धूंद वेड्या क्षणात ओथंबून वाहिलो. .
तन मन धनात एकमेकात साठवून राहिलो. .    
सवपन दोघांचे बघण्यात मन रंगवून गेलो होतो. .
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....

सहवासात प्रेमात उत्कटा होती
विरहा नंतर भेटण्याची ओढही होती.
दुखाच्या छायेत ही प्रेमाने चिंब नहालो होतो..
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....

वेगवेगळे सूर आपले. ...तरीही जुळले होते. .
आयुष्यातले छोटे क्षण तेव्हा फूलले होते. .
बोललो नाही तरी मूकपणाने संवाद साधत होतो..
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....

जगण्यातला दोघांचा अर्थ वेगळा होता. .
तुझ्या माझ्या भावनांना मार्ग मोकळा होता. ..
फक्त एका नजरेने मनाचा ठाव घेत होतो..
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....

हलली असं का वाटतं थोडसं वेगळं. .
सगळे असुनही मन उगाच का होत हळवं..
बोलताना एवढे का आपण औपचारिक होतो. .
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....

दोघं मिळून जगताना सारं हरवायला लागलं
तुझं-माझं करताना मी पण वर येवू लागलं..
मी पण सावरताना एकटेपणात हरवून गेलो. .
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....

सुंदर असले तरी सगळं वेगळं भासू लागलं..
चांगलं असलं किती तरी वाईट दिसू लागलं
या सगळ्या मूळे एकमेकांपासून दूरावत गेलो...
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....

आत्ता मात्र थोडं वेगळं वाटायला लागलं. ..
आपल्यातलं प्रेम आटायला का लागलं. .
बरोबर असूनही आपण रितं का जगायला लागलो..
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....

Thursday, 29 August 2013

जगायचं मात्र राहून जात …



Busy Busy म्हणताना ,
बरच काही हरहुन जात
सगळ काही मिळवता मिळवता,
जागायच मात्र राहून जात.…
 
                  मोठ घर , गाड़ी फ़ोन
                  मिळवण्यासाठी घरची माणस दोन
                  हौशिन घेतलेल्या सोफ्यावर बसायला
                  आपल्या जवळ वेळ नसतो,
                  सगळ काही मिळवता मिळवता,
                  जागायच मात्र राहून जात …….


रोज असो किंवा दसरा दिवाळी;
पिल्लू च्याही डब्ब्यात मावशी चीच पोळी
होटेलिंग बर्थडे पार्टी करता करता ,
घराचा डायनिंग टेबल रिता राहतो …
सगळ काही मिळवता मिळवता,
जागायच मात्र राहून जात.…।

                  सणावाराचे गोड धोड चितळ्य़ान कडून येत;
                  देवा धर्माच सगळच कस SHORTCUT होउन जात
                  आपल्या  माणसाना भेटण्या साठी WEEK-END गाठावा लागतो
                  अन नात्यां मधला प्रेमाचा दोर हळु हळु लांबत जातो। ….
                  सगळ काही मिळवता मिळवता,                  जागायच मात्र राहून जात …….

मुलांना चांगली शाळl, क्लास
कपडे लत्ते शूज ही POSH ;
लैपटॉप मोबाइल चे गेम देता देता
रात्री कुशीत घ्यायच राहून जात
सगळ काही मिळवता मिळवता,
जागायच मात्र राहून जात.…।

                  सगळी धावाधाव करताना दोघेही नसतो NORMAL
                  एका LIMIT नंतर मग होत सगळच FORMAL
                  SMS , WHATS UP , या वरच कामापूरत बोलण होत
                  मिठीत  यायला सुद्धा काहीतरी कारण शोधाव लागत। ….


……. एकदम वाटत , एकदम वाटत
दोघांनीच आपण हे सगळ सावरायला ह्व,
हळव्या, ओल्या क्षणIना   आपल्या मधे साठवायला हव
हवं तसं हव तेंव्हा थोडं तरी जगाता याव,
विखुरलेलं सारं काही दोघांनी मिळून आवरायला हवं  ….

 …         मोठं घर माणसांनी अजुन . . थोडं मोठं करावं
              हसत खेळत जेवातानाचं सुख ही थोडं अनुभवावं
             श्लोक परवचा मोठी माणसं यांनी घर भरुन जावं
             मुलांशी खेळण्यात गप्पा मारण्यात आपणही थोडं रमुन जावं। …
        

Busy Busy राहून सुद्धा
सगळ काही मिळवता येतं
आपली माणसं सांभाळली तर
खरच छान जगता येत
…… आपली माणसं सांभाळली तर
खरचं  छान जगता येतं .  






Tuesday, 13 August 2013

II आयुष्य II




काय कमवायचं काय गमवायचं 

आयुष्य असं कि त्या पुढे नमायाचं  II



कधी हसायचं कधी रडायचं

सुखांतिका क्षणी कधी फुलायचं

सुखी क्षणातच मन रमवायचं 

आयुष्य असं कि त्या पुढे नमायाचं



कधी अडकायचं त्यात गुर्फटायचं

ओझे झाले तर कधी सोडायचं

न उलगडणाऱ्या कोडयात  पुन्हा अडकायचं

आयुष्य असं कि त्या पुढे नमायाचं .



कधी फसायचं कधी फसवायचं

गोड स्वप्नात मन भुलवायचं

भंगले स्वप्न तरी त्या मागेच धावायचं

आयुष्य असं कि त्या पुढे नमायाच.



कधी वेचायचं कधी फेकायचं 

न पेलणारे, ओझं कधी वाहायचं 

लागली ठेच तरी पुन्हा उठायचं

आयुष्य असं कि त्या पुढे नमायाचं



काय कमवायचं काय गमवायचं  ?

कमी अधिकच्या फेऱ्यात का गुर्फटायचं  ?

मिळालेल्या आयुष्याच "प्रेमानं" सोनं करायचं 

आयुष्य असं कि त्या पुढे नमायाचं ......
                                                                                                   
                                                 
                                            ----अश्विनी जोशी